प्रसाद शिरगांवकर

प्यायला लागल्यावर चढायचीच
केंव्हा चढते ते कळत नाही
एकदा चढलेली उतरायचीच
उतरणं काही टळत नाही

दारु पिताना एक तत्व पाळावं
सोसेल तेवढीच प्यावी
सगळी संपवायला थोडीच हवी ?
उरली , तर घरी न्यावी!

एक एक पेग कसा
चवी चवीनं प्यायचा
किती पेग झाले याचा
हिशेब असतो द्यायचा

दारू पिऊन झाल्यानंतर
एक लढाई लढायची असते
पार्टीनंतर घरामधली
साफसफाई करायची असते

पिऊन थोडी चढणार असेल
तरच पिण्याला अर्थ आहे
एवढी ढोसून चढणार नसेल
तर आख्खा खंबा व्यर्थ आहे

मी तसा श्रध्दावान
श्रावण नेहमी पाळतो
श्रावणात फक्त दारू पितो
नॉनव्हेज मात्र टाळतो

ज्याची जागा त्याला द्यावी
भलती चूक करू नये
पिताना फक्त पीत रहावं
चकण्यानं पोट भरू नये

वेळच्यावेळी आपण ओळखावी
आपली आपली आणिबाणी
लाज सगळी सोडुन देऊन
ग्लासात घ्यावं लिंबुपाणी

पिऊन तर्र झाल्यानंतर
काय खातोय ते कळत नाही
खाल्ल्यानंतर बिलामधली
टोटल कधी जुळत नाही

Average: 8.2 (32 votes)